मल्लखांब

खेळ मातीतला : -
 मल्लखांब...
भारतात अनेक विविध खेळ खेळले जातात. यापैकी काही बैठे, मैदानी, सभागृहातील, पायावरील इ. खेळ आहेत. या सदरात आपण मल्लखांब या अस्सल मराठमोळ्या खेळाच्या प्रकरांविषयी जाणून घेणार आहोत.

लाकडी (पुरलेला) मल्लखांब  हा जमिनीवर उभा या प्रकारात मोडतो. हा मल्लखांब सागवान किंवा शिसम या लाकडापासून बनवितात. हल्ली शक्यतो सागवानपासूनच याची निर्मिती होते. या मल्लखांबाला एरंडेल तेल लावल्याने घर्षण कमी होते. सध्या हा मल्लखांब स्पर्धात्मकदृष्ट्याही उपयोगात आणला जातो. हा मल्लखांब शरीराचा वरील भाग (बोंड), मान व मल्लखांबाचे शरीर अशा तीन भागांत सरळसोटपणे असतो. बोंड हे गोलाकार असते त्याखालोखाल मल्लखांबाची मान व नंतर शरीर असे असते. या मल्लखांबाची उंची १० फूट म्हणजे जमिनीवरील ८ फूट व जमिनीखाली २ फूट असते. किंवा १२ फूट म्हणजेच जमिनीवर १० फूट व जमिनीखाली २ फूट अशीही असते. हा मल्लखांब जमिनीशी ९० अंश (काटकोनात) असतो.

मल्लखांबातील या प्रकारात विविध आढ्या, उड्या, तेढ्या, वेल, कसरतीचे व ताकदीचे व्यायामप्रकार, आसन, बोंडावरील व्यायाम प्रकार, मानेतील व्यायामप्रकार, शिडी, दसरंग, उतरत्या, फरारे इ. विविध व्यायाम प्रकार मल्लखांबपटू करतात.

मल्लखांबाच्या या व्यायाम प्रकारांचा स्पर्धात्मकदृष्ट्या
 आंतरशालेय स्तरावर,
 जिल्हा परिषद स्तरावर, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय तसेच आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापीठीय स्तरावर समावेश आहे.
 मुलांसाठी (पुरलेला) लाकडी मल्लखांब हा १२ वर्षांखालील, १४ वर्षांखालील, १८ वर्षांखालील व १८ वर्षांवरील गटांत खेळला जातो. 
हा मल्लखांब प्रकार मैदानात, पटांगणात असतो.
मल्लखांब हे नाव मल्ल या पैलवान आणि खांब या शब्दापासून बनले आहे. शब्दशः म्हणजे "कुस्ती ध्रुव", हा शब्द कुस्तीपटू वापरल्या जाणार्‍या पारंपारिक प्रशिक्षणांना सूचित करतो.

इतिहास :-
मल्लखांब खेळाचा इतिहास लिहीलेल्या अवस्थेत फार आढळुन जरी आला नसला तरी देखील तो फार जुना असल्याचे पुरावे आढळतात. पुराणात आढळुन आलेल्या दाखल्यांमध्ये रामायणकाळी प्रत्यक्ष हनुमंताने या मल्ल खांबाचा शोध लावल्याचे कळते.
ओडीसा राज्यात प्रसिध्द अश्या जगन्नाथपुरी मंदीरा जवळ सुमारे पंधराव्या शतकात एक आखाडा सुरू झाला त्याचे नाव जगन्नाथ वल्लभ आखाडा असे असुन त्याच्या स्थापनेपासुन मल्लखांबाचे प्रशिक्षण दिल्या जाते.
आपल्या महाराष्ट्रामध्ये मल्लखांबाचा इतिहास शोधायचा झाल्यास पेशवाईच्या काळात याचा मोठा प्रसार प्रचार झाल्याचे पहायला मिळते. पेशव्यांनी मोठया प्रमाणात कुस्तीचे आखाडे देषभरात सुरू केले. या आखाडयांमधुन इतर व्यायाम प्रकारासोबत मल्लखांबाची देखील सुरूवात करण्यात आली होती.
इतर समाजाच्या तुलनेत गुराखी समाजात मल्लखांबाला फार  जुन्या काळापासून महत्व देण्यात आले आहे..
मल्लखांबाविषयी इतिहासात नमुद असलेली गोष्ट – 
दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात सुमारे एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला मराठी राज्य अतिशय निकराने ब्रिटीशांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा तसेंचं पानिपतात झालेल्या पराभवातुन सावरण्याचा प्रयत्न करू पाहात होते. फुटीचे राजकारण, राजकिय आणि सामाजिक अस्थिरता, अंतर्गत वाद, यातच पेशवाई पुढे एक मोठे आव्हान येऊन उभे राहिले.
हे आव्हान आले होते ते हैदराबाद च्या निजामाकडुन…अनेक राज्यांमधुन विजय मिळवल्याने अली आणि गुलाब या दोन भिमकाय बलदंड पहेलवानांचा आत्मविश्वास अधिकच दुणावला होता . आणि या जोरावर पेशव्यांच्या भर दरबारात त्यांनी कुस्तीकरता आव्हान दिले.
पेशव्यांच्या दरबारात असलेल्या बावन्न पहेलवानांपैकी अलि आणि गुलाब ला सामोरे जाण्याची हिम्मत एकानेही दाखविली नाही. 
अत्यंत कठीण असा प्रसंग पुढे उभा राहिलेला!
एकीकडे पेशव्यांच्या अब्रुचा प्रश्न उभा झालेला आणि दुसरीकडे दरबारातील बावन्न पहिलवानांपैकी एक ही हिमतीने पुढे यायला तयार नाही हे पाहुन साधारण सतरा अठरा वर्षे वयाचे बाळभट देवधर पुढे आले. ते पेशव्यांकडे भिक्षुकी करीत असत.
अली आणि गुलाब यांचे आव्हान त्यांनी स्विकारले आणि तयारीकरता काही अवधी मागितला. नाशिक नजिकचं कोठुरे हे त्यांचं गावं ! गावी जाउन आईचे आशिर्वाद घेतले आणि वणी गडावर जाऊन सप्तश्रृंगीची आराधना सुरू केली.
त्यांची प्रामाणिक आणि कठोर अशी तपश्चर्या पाहुन देवीने असा आशिर्वाद दिला की प्रत्यक्ष रामभक्त हनुमान बाळभटांना कुस्तीचे धडे देतील.
हुनमंताने दृष्टांत देउन बाळभटांना एका लाकडाच्या खांबावर कुस्तीचे डाव शिकवीले.
मागितलेली मुदत संपण्याअगोदर बाळभट पुनश्च पुण्यात आले आणि आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, ताकदीने बलाढय अश्या अलीला आपल्या कुस्तीतील गुणांनी एका झटक्यात धुळ चारली. बाळभटांचे हे कुस्तीचे डावपेच पाहुन गुलाब पहेलवान तर अक्षरशः पळुनच गेला.
बाळभट देवधर ज्या लाकडी खांबावर सराव करीत होते त्याला मल्लखांब असे नाव देण्यात आले.
आणि अशी मल्लखांब या व्यायामप्रकाराची सुरूवात झाली. पहेलवानांनी आपल्या साथीदाराच्या अनुपस्थितीत ज्या लाकडी खांबावर सरावाचे धडे गिरवायचे असतात त्याला ‘मल्लखांब’ असे म्हणतात.
कुस्तीचे आखाडे आणि मल्लखांबाचा प्रचारप्रसार ...
सुमारे 1818 दरम्यान मराठा संस्थान खालसा झाले आणि ब्रिटीशांनी उत्तरप्रदेशात कानपुरनजीक ब्रम्हावर्त या ठिकाणी पेशव्यांची रवानगी केली. पुणे येथुन ब्रम्हावर्त येथे जात असतांना पेशव्यांच्या सोबत बाळभट सुध्दा होते. ज्या ज्या ठिकाणी पेशव्यांचा मुक्काम असे त्या त्या ठिकाणी बाळभट देवधरांनी कुस्तीकरीता आखाडे उभारले त्या कुस्तीच्या आखाडयांमध्ये सुध्दा मल्लखांब लावले.

पहिला आखाडा वाराणसी येथे सुरू झाला. बाळभटांनी कोंडभटनाना गोडबोले, टकेजमाल यांना मल्लखांबाचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले. पुढे मल्लखांबाचे प्रात्यक्षिक इतरांना देतांना टकेजमाल नेहमी बाळभटांसोबत असायचे.
ग्वाल्हेर, इंदूर, उज्जैन, भोपाळ, देवास, बडोदा, सुरत, झांशी, या ठिकाणी सुरू झालेले आखाडे आजही सुरूच आहेत आणि तेथे मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले जाते.
बाळभटांमुळे कोंडभटनाना गोडबोले, टकेजमाल, जुम्मादादा, राजरत्न प्रा. माणिकराव, दामोदरगुरू मोघे, बाळभट दादांचे पुत्र नारायणगुरू देवधर यांनी पुढे भारतात मल्लखांबाचा प्रचार प्रसार होण्याकरीता खुप प्रयत्न केले.
  आधुनिक काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे व्यायामशिक्षक बाळंभटदादा देवधर (सु. १७८०−सु. १८५२) ह्यांनी मल्लखांबविद्येचे पुनरूज्जीवन केले, कुस्तीगिराच्या अंगी ताकद, चपळता, लवचिकपणा, डावपेचात्मक सफाई इ. गुणांच्या वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा या उद्देशाने बाळंभटदादांनी मल्लखांबावरील निरनिराळ्या मेहनतींचे व उड्यांचे प्रकार तयार केले.
 मल्लखांब गुळगुळीत रहावा, तसेच तो घट्ट पकडता यावा व घसरू नये म्हणून एरंडेल तेलाचा तसेच राळेचा वापर करतात.
मल्लखांबावरील कसरतींचे एकूण १६ गट पडतात. या प्रत्येक गटामध्ये अनेक उपप्रकार आहेत. 
या मूलभूत गटांचा थोडक्यात परिचय पुढे दिला आहे :
(१) अढी : मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार. मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन व शरीर उलटे करून पोट मल्लखांबांच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला ‘अढी घालणे’ असे म्हणतात. या अढ्यांतून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्नभिन्न प्रकार आहेत. अढ्यांचे एकंदर ९० च्या वर प्रकार आहेत. उदा., साधी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्याचा उपयोग कुस्तीत होतो. तसेच अश्वारोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नायू बळकट होतात.
(२) तेढी :  मल्लखांब विविध प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबास विळखा घालण्याच्या प्रक्रियेस ‘तेढी घालणे’ असे म्हणतात. तेढीनंतर अढी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल इ. ठिकाणच्या स्नायूंना व्यायाम होतो. उदा., साधी तेढी, बगलेची तेढी, एकहाती तेढी इत्यादी.
(३) बगली :  मल्लखांब बगलेत निरनिरळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्यास ‘बगली’ असे म्हणतात.
(४) दसरंग :   मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली  यांसारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे याला ‘दसरंग’ असे म्हणतात. हा ‘दस्तरंग’ (दस्त म्हणजे कोपरापुढील हात) शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्या अढीचा वा तेढीचा दसरंग त्याप्रमाणे त्याचे नाव असते. उदा., साधा दसरंग, एकहाती दसरंग इत्यादी.
(५) फिरकी : मल्लखांबावर दसरंग करीत असताना हाताची व पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाण्याच्या क्रियेला ‘फिरकी’ असे म्हणतात. फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत.
(६) सुईदोरा :  सुईमध्ये दोरा ज्याप्रमाणे ओवतात, त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला ‘सुईदोरा फिरणे’ असे म्हणतात. ह्याचेदेखील अनेक प्रकार आहेत.
(७) वेल : हाताच्या व पायाच्या विशिष्ट पकडीच्या सहाय्याने,त्या पकडी सतत बदलत हळूहळू वर चढत जाणे, या क्रियेला ‘वेल’ असे म्हणतात. झाडावर वेल जशी नागमोडी चढत जाते, त्याचप्रकारे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. उदा., साधीचा वेल, मुरडीचा वेल, नकीकसाचा वेल इत्यादी.
(८)  उतरती : ही वेलाच्या विरूद्ध पद्धतीची हालचाल आहे. वेलाप्रमाणेच पकडी बदलत या क्रियेत मल्लखांबपटू खाली घसरत घसरत येतो. उदा., साधी उतरती, बगलीची उतरती इत्यादी.
(९) झाप : मल्लखांबाच्या बोंडावर उभे राहून अथवा बसून पतंगी, विविध फरारे अशा प्रकारांतून मल्लखांबापासून दूर फेकले जाऊन पुन्हा मल्लखांब अढीमध्ये पकडणे याला ‘झाप टाकणे’ असे म्हणतात.
(१०) फरारे : मल्लखांबावर हातांनी विविध प्रकारे धरून व पाय दूर ताठ करून तोल सांभाळण्याच्या क्रियेला ‘फरारे’ असे म्हणतात. क्वचित मल्लखांब पायाने पकडून हात मोकळे सोडले जातात. उदा., आकडी, गुरुपकड, बजरंग−पकड इत्यादी.

*(११)योगासने : निरनिराळ्या प्रकारची आसने मल्लखांबाच्या अंगापासून बोंडापर्यंत विविध प्रकारे करता येतात. उदा., पद्मासन, गरुडासन, धनुरासन, शीर्षासन, वृश्चिकासन इत्यादी....*

(१२) आरोहण−उड्या : मल्लखांबापासून  काही अंतरावरून पळत येऊन, अथवा मल्लखांबाच्या शेजारी उभे राहून, अथवा उडी मारून हाताने पकड घेता, अगर न घेता पायाने मल्लखांब अढीत अथवा तेढीत पकडणे यांना ‘आरोहण-उड्या’ असे म्हणतात. यात घोडा अढी, घोडा तेढी, सुळकी अढी, गुलाट अढी इत्यादींचा समावेश होतो. आधुनिक स्पर्धात्मक मल्लखांबात या उड्यांना फार महत्त्व आहे.
(१३) उड्या : मल्लखांबावरून विविध प्रकारे दूर उड्या मारून जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला ‘उड्या’ असे म्हणतात. यातच विविध कलाटींचा समावेश होतो.
(१४) ताजवे : मल्लखांबाच्या बोंडावर पोट, पाठ अथवा शरीराचा अन्य भाग टेकवून, मल्लखांब हातापायाने न पकडता शरीर तोलण्याला ‘ताजवे’ (तराजू) असे म्हणतात. ह्याचे पोटाचा ताजवा व पाठीचा ताजवा हे प्रकार विशेष प्रचलित आहेत. ताजवे म्हणजे फरारे या प्रकारातीलच पोट-उड्या म्हणाव्या लागतील.
(१५) सलाम्या : अढ्यांप्रमाणेच विविध प्रकारे मल्लखांबावर पकड घेऊन, शरीर उलटे करून अढी न मारता पुन्हा जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला ‘सलामी मारणे’ असे म्हणतात. सलामीच्या पकडीनुसार त्यांना एकहाती, दुहाती, बगलीची अशी नावे आहेत.
(१६) मल्लखांबावरून विविध प्रकार केल्यानंतर उतरण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे अढीच्या स्थितीमधून कलाट, त्याचप्रमाणे विविध आसनांमधून उडी व कलाट असे प्रकार आहेत. ह्या प्रकारांमध्ये नावीन्य आणण्याच्या दृष्टीने मल्लखांबावरून पुढे अथवा मागे गुलाट मारणे यांसारखे नवीन प्रकार केले जातात.

मल्लखांबाचे एकंदर बावीस प्रकार आहेत. प्रचलित साध्या (किंवा स्थिर) मल्लखांबाखेरीज अन्य प्रमुख उपयुक्त प्रकार पुढीलप्रमाणे होत : -

वेताचा मल्लखांब : -
शरीराची लवचिकता व संतुलन राखण्याच्या दृष्टीने वेताचा मल्लखांब फार उपयुक्त असतो. सुमारे ३ ते ४ मी. लांबीचा लवचिक वेत लोखंडी हुकाला टांगला जातो. यावर प्रामुख्याने आसने व फरारे या गटांतील प्रकार करणे शक्य असते. वेताऐवजी जाड दोर वापरूनही मल्लखांब−कसरती केल्या जातात.

टांगता मल्लखांब : -
१ १/२ ते २ मी. उंचीचा लहान आकाराचा हा मल्लखांब छतापासून दोरीने टांगला जातो. या मल्लखांबावर प्रामुख्याने कसाचे व शरीरसामर्थ्याचे प्रकार केले जातात. हा मल्लखांब टांगलेला असल्याने तो स्वतःभोवती तसेच वर्तुळाकृती फेऱ्यातही फिरत असल्याने खेळाडूला विशेष कोशल्य आत्मसात करावे लागते.

निराधार मल्लखांब : -
केवळ १ ते १ १/२ मी. उंचीचा हा मल्लखांब बुंध्यात तिरपा छाट घेतलेला असतो. तो जमिनीत न पुरता पाटावर, अथवा बाटल्यांवर ठेवलेल्या स्टुलावर (बाटलीचा मल्लखांब) ठेवला जातो. यावर आसने आणि फरारे या गटांतील प्रकार प्रामुख्याने केले जातात. मल्लखांबास कोणताही आधार नसल्याने खेळाडूस आपले कौशल्य पणास लावावे लागते. श्वासनियंत्रण, शरीर-संतुलन यांसारखी व्यायामकौशल्ये यांमुळे साध्य होतात. 
याबरोबरच बाटलीवरील, पलित्याचा, हत्यारी मल्लखांब इ. प्रकारही काहीसे प्रचलित आहेत.

मल्लखांबावरील मनोरे : -
प्रामुख्याने प्रात्यक्षिकांसाठी मल्लखांबावर मनोरे सादर केले जातात. या प्रकारात एकाच वेळी १० ते २० खेळाडू मल्लखांबावर तसेच जमिनीवरही आपापल्या जागा पटकावतात आणि कमळ, देऊळ, मत्स्याकृती, गरूड, उडत्या आकृत्या इ. प्रकारचे मनोरे सादर करतात. अत्यंत आकर्षक असे हे मनोरे व्यायामाच्या दृष्टीने दुय्यम महत्त्वाचे आहेत. 

प्रात्यक्षिकातच त्यांना विशेष महत्त्व आहे. अशा मनोऱ्यांच्याही स्पर्धा घेतल्या जातात.
मल्लखांबावरील कसरतींमुळे व्यक्तीमध्ये शारीरिक सुदृढता, लवचिकपणा, चपळपणा, संतुलन, साहस इ. गुण वाढीस लागतात. शरीराचे स्नायू पिळदार व बळकट होऊन विशेषतः पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो. तद्वतच यकृत, मूत्रपिंड, प्लीहा इ. अवयवांची कार्यक्षमता वाढते व रक्तभिसरण क्रिया सुधारते.
 कुस्तीप्रमाणेच जूदो, ॲथ्‌लेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, घोडदौड इ. अनेक खेळांत हा व्यायामप्रकार उपयुक्त ठरतो.
मल्लखांबाच्या आंतरशालेय, जिल्हा आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेतल्या जातात. १९८०-८१ पासूनमल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेमार्फत राष्ट्रीय पातळीवरही स्पर्धा घेण्यात येतात. विशेष कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार वा अन्य पारितोषिके देऊन गौरव करण्यात येतो. 
तसेच राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठातर्फे शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. मल्लखांबाच्या कोणत्याही पातळीवरील स्पर्धा साधारणपणे कनिष्ठ, मध्यम, व वरिष्ठ अशा तीन गटांत घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूस मल्लखांबाच्या १६ कसरत−गटांमध्ये विविध प्रकारे, साधारणपणे ९० सेकंदांच्या कालावधीत आपले कौशल्य दाखवायचे असते.
भारतातील मल्लखांब
भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू इ. राज्यांत मल्लखांब खेळला जातो. 
महाराष्ट्रामध्ये पुण्याबरोबरच मुंबई, नाशिक, अहमदनगर, अमरावती, मिरज, नागपूर इ. ठिकाणी मल्लखांबाचा सराव नियमितपणे केला जातो. या सर्व ठिकाणच्या व्यायामशाळा विविध मल्लखांब स्पर्धा आयोजित करीत असतात. त्यांना निरनिराळ्या ठिकाणच्या खेळाडूंचा उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

*मल्लखांब परदेशात लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने अमरावतीच्या ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’चे कार्य उल्लेखनीय आहे.*
 बर्लिनच्या ऑलिंपिक स्पर्धात (१९३६) त्यांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. जर्मन क्रीडारसिकांना हा प्रकार अतिशय आवडला. सध्या पश्चिम जर्मनीतील कोलोन येथील क्रीडा-विद्यापीठात मल्लखांबाचा सराव व संशोधनकार्य चालू आहे.
 दिल्ली येथे भरलेल्या नवव्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये (१९८२) 
पुण्याच्या ‘महाराष्ट्रीय मंडळा’ने विविध प्रकारच्या मल्लखांबांचे प्रात्यक्षिक दाखविले.
 ते अत्यंत प्रेक्षणीय व प्रशंसनीय ठरले होते. सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय क्रीडाशास्त्र परिषदेत (मे १९८३) तसेच नंतरच्या आग्नेय आशियाई सामन्यांत आणि थायलंड, मलेशिया इ. राष्ट्रांत महाराष्ट्रीय मंडळातर्फे मल्लखांबाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली होती. 
आजही महाराष्ट्र मंडळा त मल्लखांब सर्व प्रकारची माहिती देऊन शिकविला जातो...
लॉस अँजेल्स येथील ऑलिंपिकपूर्व क्रीडाशास्त्र परिषदेत (१९८४)
 रा. द. जालनापूरकर व लीला जोशी यांनी मल्लखांबावर सादर केलेला निबंध तज्ञांच्या प्रशस्तीस पात्र ठरला होता...

मल्लखांबामुळे होणारे शारिरीक फायदे :– 
मल्लखांबाला तेल लावले असल्याने शरीराचे सतत घर्षण त्या खांबाला होते आणि उत्तमरित्या आपल्या शरीराला तेलाची मालिश होते.
यकृत, प्लिहा, तसच आंतरेन्द्रिय ही कार्यक्षम राहातात.
उलट-सुलट वेगवान हालचाली झाल्यामुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण, या शरीरातल्या व्यवस्था कार्यक्षम राहतात.
अतिरीक्त वाढलेली चरबी, सुटलेले पोट, मेद, कमी होते.
आपल्या हातापायांचे पंजे, मांडया, पोटऱ्या, दंड,खांदे, यांच्या आतल्या संस्था फार कार्यक्षम होतात.
पोटाचे स्नायु, बरगडया, पाठीचा कणा बळकट होण्यास मदत मिळते.
फक्त शारीरीक विकासच नव्हें तर मानसिक स्वास्थ्य मल्लखांबामुळे उत्तम राहाण्यास मदत मिळते.
तसं पाहाता मल्लखांब हा काटकसरीचा खेळ आहे असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही कारण या खेळाकरता तशी कुठलीही सामुग्री लागत नाही. मोठे क्रिडांगण, चेंडु, रॅकेट, बॅट, बुट याची देखील आवश्यकता नाही.
शरीराची जडणघडण उत्तम होते, प्रमाणबध्द शरीर, उत्तम आरोग्य, कुशाग्र मानसिक क्षमता, आजच्या वेगवान स्पर्धेकरता लागणारे क्रिडाकौशल्य मिळवायचे असेल तर ‘मल्लखांब’ हा उत्तम पर्याय आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

27 नक्षत्र मंत्र आणि वनस्पती...

*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*